6.17.2023

जगातील महा बोधविहार

                                                            जगातील महा बुद्धविहार  

२५०० हजार वर्षांपासून बौद्धधर्म अस्तित्वात आहे.  बौद्ध धर्माचा प्रसार आणि  विस्तार व्हावा यासाठी जगभरात बौद्धभिकूनी अनेक स्तूप व विहार बांधले .  आजही काही  वस्तू , वास्तू व स्तूप नव्याने आढळून येत असून जे बौद्ध धम्माच्या विस्तार आणि प्रसाराच्या कहाण्या कथन करत आहेत.  असेच एकदा कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकांची सत्ता होती. वर्ष होते १८६०. त्या काळोख्या दाट जंगलात पुढे पाऊल ठेवण्यासाठी त्याला झुडपे, वेली तोडतच पुढे जावे लागतं होते. किर्र जंगलात शोधता शोधता अचानक त्याला समोर असे काही दिसले की त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले! क्षणभरं त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना! समोर होती, त्याच्या नजरेच्या कवेत मावत नव्हती, एवढी प्रचंड इमारत! संपूर्ण दगडात बांधलेली! जंगलामध्ये लुप्त! शेकडो वर्षांपासून मानवी हस्तक्षेपासून दूर, महाकाय झाडांनी वेढलेली.अवाढव्य, महाप्रचंड आणि अदभूत!खरेतरं, अविश्वसनीय!  त्याने त्याच्या आयुष्यात एवढी महाप्रचंड इमारत पाहिली नव्हती. त्यानेचं काय, संपुर्ण युरोप खंडात कोणीही अशी इमारत पाहिली नव्हती. पाहणार तरी कशी? कारण एवढ्या प्रचंड आकाराची इमारत संपूर्ण युरोपमध्ये नव्हतीचं! कोणी बांधण्याचा विचारही करू शकतं नव्हते. आधुनिक तंत्रज्ञानात स्वत:ला खुप प्रगत समजणाऱ्या संपुर्ण युरोपला आणि जगाला थक्क करणारी ही घटना होती! 

एक महाविहार ! भारतापासून ५००० किलोमीटर दुर देशातील एक महाकाय बुद्ध विहार !आजमितीसही, 'अंग्कोर वाट' जगातले सर्वात मोठे वंदना स्थळ आहे! जगात कुठल्याही धर्माचे एवढे मोठे प्रार्थनास्थळ नाही.एवढे अवाढव्य वंदना स्थळ त्यापुर्वी ना कोणी बांधले होते, ना कोणी नंतर बांधू शकला!एका कंबोडियन बौद्ध सम्राटाने हे बांधले होते १२व्या शतकात! 

इसवीसन ११५०च्या सुमारास! मात्र, १५व्या शतकापासून काही अनाकलनीय कारणाने ते जंगलात लुप्त झाले होते. मंदिरातले बोटावर मोजण्याएवढे बौद्ध भिक्षू आणि मंदिर परीसरात राहणारे काही आदिवासी खेडूत वगळता, शेकडो किलोमीटर अंतरात लोकवस्तीही नव्हती...५०० एकर एवढ्या भव्य क्षेत्रफळावर बांधलेले 'अंग्कोर वाट' विहार आहे, भगवान बुद्धांचे...! मुख्य प्रवेशद्वारापासून गर्भगृहापर्यंत पोहोचायलाचं ३ ते ४ किलोमीटर चालावे लागते! विहाराच्या सभोवती एक आयताकृती कालवा आहे, त्याचीच एकत्रित लांबी ५.५ किलोमीटर आहे! ४ मिटर खोल असलेल्या या कालव्याची रूंदी आहे २५० मिटर म्हणजे पाव किलोमीटर! हा कालवा ओलांडूनच विहाराच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतां येते! फक्त पहिल्या प्रवेशद्वारापाशी, विहारात नाही! पुढे अशी अजून दोन प्रवेशद्वारे ओलांडूनचं आपण मुख्य विहाराजवळ येतो!तत्कालीन कंबोडियन बौद्ध राजा (दुसऱ्या) सुर्यवर्मनने हे भव्यदिव्य विहार घडवले, तेव्हा कालांतराने ही वास्तू जगातल्या आश्चर्यांपैकी एक मानली जाईल, असे त्याला वाटलेही नसेल! 'अंग्कोर वाट'पेक्षा आकाराने निम्म्या वा त्याहूनही छोटे असणाऱ्या युरोपातले 'कॅथेड्रल्स' बांधायला १५० ते २०० वर्षे लागली, काहींना ३००!दुसऱ्या सुर्यवर्मनने हे विहार घडवले ते फक्त ३० ते ३५ वर्षात!लाखो कंबोडियन नागरिक,कामगार, कारागीर, मूर्तीकार, निष्णात अभियंते, वास्तूरचनाकार, शेकडो हत्ती, हजारो बैलगाड्या, तराफे या विहारासाठी ३५ वर्षे अविरतं झटतं होते!  ४८ लाख टनांपेक्षा जास्त दगड लागले, ही वास्तू पुर्ण करण्यासाठी. बरं हा दगडही मंदिराच्या जवळपास ऊपलब्ध नव्हता, तो आणावा लागला दुर असलेला महेंद्र नामक पर्वत फोडून. रस्तामार्गे हे जड दगड वाहाणे अशक्य होते. नदीतून आणावे म्हंटले तर अशी नदीही या बांधकाम स्थानापासून दुर होती. अंतर जवळपास ८०-९० किलोमीटर होत होते. एवढे वजनदार आणि एवढ्या संख्येने दगड वाहून आणने, महाकठीण काम.  

दुसऱ्या सुर्यवर्मनकडे या अवाढव्य  महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी होत्या. वैभवशाली राज्य असल्याने पैशांचा तर महापुर होता, नव्हता तो फक्त वेळ!  त्याला त्याच्या जिवनकालातचं हे विहार पुर्ण करायचे होते. मग या राजाच्या बुद्धिमान अभियंत्यांनी महेंद्र पर्वतापासून मंदिराच्या स्थानापर्यंत महाप्रचंड असे कालव्यांचे जाळे ऊभारले!

 डोंगरातून कापलेले दगड तराफ्याने कालव्यांमार्गे बांधकामाच्या ठिकाणी आणले जायचे, तिथे त्यांना जरूरीप्रमाणे कापले जायचे. एकमेकांवर घासून हे कठीण दगड चारही बाजूने सपाट केले जायचे आणि मग बांधकामात वापरले जायचे! दगडाचे असे किती तुकडे एकूण बांधकामासाठी लागले, याची मोजदाद अशक्य! या साऱ्या बांधकामासाठी ना सिमेंट, ना काँक्रीट ना लोखंड! सगळे बांधकाम दगडावर दगड रचून साकारायचे म्हणजे अतिशय कठीण आणि जोखमीचे काम! आतमध्ये दगडी भित्तिचित्रे असलेल्या दोन-दोन किलोमीटर लांब दगडी 'गॅलरीज' आहेत (यांचे छप्परसुद्धा दगडाचेच). त्यांना आधार द्यायला जे असंख्य खांब आहेत, ते सगळे इतके काटेकोरपणे सरळ रांगेत की तसुभरही फरक नाही.एक मिलिमीटर सुद्धा मागे पुढे नाही! आजकालच्या 'लेझर' किरणांच्या तोडीस तोड तंत्रज्ञान! बांधकामातले कौशल्य अचंबीत करते! अतिशय अवघड असे हे तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाविषयी फारशी माहिती आता ऊपलब्ध नाही, पण हे लोक फारचं प्रगत तंत्रज्ञान वापरत होते, यात शंकाच नाही!

अशा ३ गॅलरीज आहेत. ह्या ज्या लांबलचक गॅलरीज आहेत, त्यांनी संपुर्ण मंदिराला विळखा घातलायं. २५० मिटरचा कालवा ओलांडून आले की, एक प्रवेशद्वार. ते ओलांडून एक-दिड किलोमीटर पार केल्यावर दुसरे प्रवेशद्वारं. हे प्रवेशद्वार पहिल्या आयताकृती  महाप्रचंड गॅलरीचा भाग आहे. ते पार करून थोड्या ऊंचावर दुसरी आयताकार गॅलरी सुरू होते. ती पार करून मग तिसरी आणि मग मुख्य विहाराची सुरुवात!  सगळ्या गॅलरीज एकापेक्षा एक ऊंचावर आहेत. एका पिरॅमिड सारखी रचना. सगळ्यात वर विहाराचे आभाळात घुसलेले ५ कळसं.... एक मुख्य कळस मध्यभागी आणि चार उपदिशांना ऊंचीने थोडे कमी असलेले  चार  कळस. सुरूवातीला ओलांडून यायच्या कालव्यापासून ऊंची मोजली, तर मुख्य कळसाची ऊंची २३३ मिटर आहे! म्हणजेचं ७०-८० मजली ऊंच इमारती एवढी!  हे विहार पुर्ण झाले आणि आजुबाजुला लोकवस्ती झाली, तेव्हा लंडनची लोकसंख्या होती ३०,०००, आणि 'अंग्कोर'ची लोकसंख्या होती दहा लाख! युरोपात औद्योगिक क्रांती होण्याअगोदरचे जगातले सर्वात मोठे शहर बांधकामाच्या कलेत आणि शास्त्रात प्राविण्य असलेले, बौद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, एक सुसंस्कृत शहरं!

आजही भल्या भल्या अभियंत्यांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या या विहाराची रचना, बांधणी त्याकाळी कशी केली असेल या विचाराने थक्क व्हायला होते! या गॅलरीजमध्ये अडीच मिटर ऊंच आणि एकत्रित साडेचार किलोमीटर लांब अशी दगडात कोरलेली असंख्य आणि अखंड भित्तिचित्रे आहेत! विहारात जवळपास १५०० अप्सरा कोरल्यात, प्रत्येक अप्सरा वेगळी! एकीसारखी दुसरी नाही. सारख्या वाटल्या आणि निरखून पाहिले तर पैंजण तरी वेगळे असेल, बाजुबंद तरी वेगळा असेल, हार वा कंगण तरी वेगळे असेल वा केशभूषा! ही सगळी भित्तिचित्रे बघायची म्हंटली तर चार-पाच किलोमीटरची पायपीट आलीचं! हे सारे कोरीवकाम दगडी भिंतीवर तिन ते चार इंच खोलीत!  हे कोरणे तर अवघडंच, पण असा एवढा मोठा 'कॅनव्हास' तयार करणेही सोपे नव्हते. एकावर एक अशा दहा-बारा शिळा चढवून भिंत बनवलेली. दोन दगडांमध्ये हवासुद्धा जाऊ नये इतके एकमेकांवर घासायचे, नंतर पुर्ण भिंत नाजूक  छिन्नी-हातोड्याने एकसंध बनवायची आणि मुर्तीकारांच्या सुपूर्द करायची.

मग या कलाकारांचे कोरायचे काम सुरू! भित्तिचित्रे कोरताना एखाद्यावेळी हातोडा जोरात पडला, एखादी चुक झालीच, तर संपूर्ण भिंतच परत रचायची! परत सपाट करायची आणि परत पहिल्यापासून कोरायला सुरूवात करायची! असे अवाढव्य बुद्ध विहार बांधायची कल्पना करणे, असंख्य अडचणींवर मात करून ती कल्पना प्रत्यक्षात उतरवने हे सारेचं अफलातून! असे म्हणतात की या विहाराच्या ऊभारणीसाठी दुसऱ्या सुर्यवर्मनच्या राज्यातील प्रत्येक कुटूंबातील एकजण तरी सहभागी होता.

संदर्भ व्हॉट्सॲप 

6.07.2023

डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख (Darwins Theory of Evolution)

 अभ्यासक्रमातून डार्विनचा सिद्धांतच  वगळला : डार्विनच्या सिद्धान्ताची पुन्हा एकदा ओळख 


मानव व प्राणी यांची उत्क्राती विषयी माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल व संभ्रम आहे..  निसर्ग निर्मितीबरोबरच पृथ्वीतलावर  प्राणी वनस्पतीची व सर्व जीवांची निर्मिती व उत्पत्ती परमेश्वरानेच केली आहे असा दृढ समज जगातील अखंड जगातील विविध जाती धर्मात आढळून येते.  परंतु १९०० व्या शतकात डार्विन नावाच्या  प्रचंड विद्वान आणि जैवविविधतेच्यां   अभ्यासकाने अनेक निष्कर्षातून मानव व प्राणी यांच्या उत्क्रांतीचे रहस्य जगासमोर मांडले त्यालाच आपण आज उत्क्रांती म्हणतो. व सर चार्ल्स डार्विन यांना उत्क्रातिवादाचा जनक म्हणून ओळखले जाते. 

चार्ल्स डार्विन या वैज्ञानिकाने एकोणिसाव्या शतकात प्रचंड मेहनतीने संशोधन करून जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि उत्क्रांतीबद्दलचे सिद्धान्त मांडले. बायबलमधील जीवसृष्टी आणि मानवाच्या उत्पत्तीच्या संदर्भातील ‘जेनेसिस’च्या संकल्पनेला डार्विन यांनी छेद दिला. बाविसाव्या वर्षी, म्हणजे १८३१मध्ये त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात पुरेसा वेळ घालवता येईल, अशी संधी चालून आली. समुद्राच्या प्रवाहांचा, खोलीचा अभ्यास करणे, युरोपीय आरमाराच्या गलबतांचा प्रवासमार्ग ठरवण्यासाठी सागरी मार्गाचे नकाशे तयार करणे या व अशा कामांसाठी सागर सफरींचे वारंवार आयोजन करण्यात येत होते. ‘एचएमएस बीगल’ नावाच्या जहाजाची अशीच एक मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेसाठी सागरी किनाऱ्यांवरील जीवसृष्टीचा, जीविधतेचा अभ्यास करणारा, त्यात रस असणारा एखादा तरुण निसर्ग अभ्यासक त्यांना हवा होता. तरुण चार्ल्सला हे कळल्यावर, त्याने वेळ वाया न दवडता खूप धडपड करून या मोहिमेत प्रवेश मिळवला.

सन १८३१मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर जहाजावर चढलेले चार्ल्स डार्विन आणि १८३६मध्ये ब्रिटनच्या किनाऱ्यावर उतरलेले चार्ल्स डार्विन यांच्या जीवसृष्टी व जीविधतेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला होता. या प्रवासात त्यांनी प्रत्येक ठिकाणी, दर मुक्कामात जीवसृष्टीचा सखोल अभ्यास केला. देवाने एकाच वेळी एकाच ठिकाणी काही तरी विशिष्ट शरीररचना असलेले जीव तयार केले आणि ते त्याच ठिकाणी काहीही बदल न होता टिकून राहिले, या त्यांच्या समजाला तडा गेला. ते या अफाट नैसर्गिक सृष्टीकडे वेगळ्या, नव्या नजरेने पाहू लागले. या सखोल निरीक्षणातून जीवसृष्टीच्या निर्मितीचे कोडे उलगडण्याची प्रक्रिया त्यांच्या डोक्यात हळूहळू चालू झाली. जीवसृष्टीतील विविध जिवांचा एकच समान पूर्वज असणार, असे त्यांना सर्व निरीक्षणांवरून वाटले. आश्चर्य म्हणजे १९२८मध्ये, म्हणजे डार्विन यांच्या मृत्यूनंतर जवळपास ४६ वर्षांनी ओपारीन आणि हाल्डेन या जोडगोळीने साधारण साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी जैविक रसायनांच्या अभिक्रियेतून सजीवांच्या शरीरातील मूलभूत रासायनिक घटक असलेला पेशीद्रव्याचा एक ‘गोळा’ निर्माण झाला; हा गोळा सजीवांचा मूळ जनक असला पाहिजे, असा सिद्धान्त मांडला. पुढे स्टेनले आणि मिलर या शास्त्रज्ञांनी हा सिद्धान्त प्रयोगशाळेत सिद्ध करून दाखवला. डार्विन यांच्या विचारांमध्ये डोकावणारा हाच तो सामायिक, समान पूर्वज. पुढे या सामायिक पूर्वजापासून लाखो शाखा-उपशाखा असलेला जीवसृष्टीचा महावटवृक्ष निर्माण झाला. एकूणच जीवसृष्टी अतिशय संथ; पण सातत्याने चालू असलेल्या परिवर्तनातून, म्हणजेच उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे, हे डार्विन यांच्या लक्षात येऊ लागले. डार्विन यांची निरीक्षणशक्ती अफाट आणि बुद्धिमत्ता विलक्षण होती. त्यांनी गोळा केलेल्या प्राणी व वनस्पतींच्या नमुन्यांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून, ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पिसीज’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी सर्व सजीव प्रजाती एकाच समान पूर्वजापासून क्रमाक्रमाने, लाखो वर्षांच्या कालखंडात नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार विकसित झाल्या आहेत आणि होत आहेत, असा निष्कर्ष मांडला. हा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर युरोपातील धर्ममार्तंड खवळून उठले. याचे कारण, ‘जेनेसिस’मधील सर्व संकल्पना या ग्रंथामुळे बाद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे डार्विन यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. 

या ग्रंथानंतर मानवाच्या उत्क्रांतीची शास्त्रशुद्ध कहाणी सांगणारा ‘द डिसेंट ऑफ मॅन’ हा डार्विन यांचा दुसरा अत्यंत मौल्यवान ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी मानवाची उत्क्रांती कशी झाली असावी, याचे तर्कसंगत, शास्त्रीय आधारावर वर्णन केले. आजच्या काळातील वानर-माकड, गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस हे सर्व प्राणी त्यांच्या विशिष्ट लक्षणांमुळे वर्गीकरण शास्त्राच्या नियमानुसार ‘प्रायमेट’ या एकाच गटात मोडतात. पुढे वानर-माकड यांचा वेगळा गट झाला, तर गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि मानवाचा आदिपूर्वज यांचा वेगळा गट बनला. या गटाला ‘कपी’ किंवा ‘एप’ या नावाने ओळखले जाते. या सर्वांचा एकच सामायिक, समान पूर्वज होता. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या ओघात एकाच पूर्वजापासून या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होत गेल्या. यात पुढे साधारण ७० लाख वर्षांपूर्वी चिंपांझी आणि मानव यांचा समान पूर्वज अवतरला. त्याला नाव दिले गेले ‘साहेलान्थ्रोपस’. हा आफ्रिकेच्या घनदाट अरण्यात वास्तव्य करत होता. या प्राण्यापासून ४० लाख वर्षांपूर्वी पुढे दोन वंश निर्माण झाले. एक म्हणजे, चिंपांझी आणि दुसरा मानववंशाचा खरा मूळपुरुष ‘ऑस्ट्रॅलोपिथेकस’. यांची पुढील लक्षावधी वर्षे उत्क्रांती होत गेली. त्यांच्या मेंदूच्या आकारमानात बदल होत गेले. बुद्धी अधिक प्रगल्भ होत गेली आणि साधारण ५० हजार वर्षांपूर्वी आजच्या मानवाची, म्हणजे आपली, म्हणजेच ‘होमो सेपियन्स’ या प्रजातीची उत्पत्ती झाली. यावरून हे सिद्ध होते, की माणूस आणि माकड यांचे मूळ पूर्वज समान असले, तरी माकडापासून माणसाची उत्पत्ती झालेली नाही; किंबहुना कपी कुळातील गोरिला, चिंपांझी, ओरँगउटान आणि माणूस या सर्वांमध्ये काही मूलभूत लक्षणे सारखी असली, तरी त्यांच्यात कमालीचे वैविध्य आहे. त्यातल्या त्यात चिंपांझी आपल्याला अधिक जवळचा आहे. माणूस आणि चिंपांझी यांची ९८ टक्के जनुके (जीन्स) एकसारखी आहेत.


या सर्व बाबींचा विचार केल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, की माणूस हा माकडापासून उत्क्रांत झालेला नाही. वास्तवात डार्विन यांनीही हे कधी म्हटले नव्हते. दुसरे म्हणजे, पृथ्वीवरील सजीवांची उत्पत्ती विविध धर्मग्रंथांमध्ये उद्धृत केल्याप्रमाणे कोण्या एकाने केली नसून, ४५० कोटी वर्षांच्या इतिहासात पृथ्वीच्या अवाढव्य रंगमंचावर सातत्याने सुरू असलेल्या उत्क्रांतीच्या महानाट्यातील अगणित अंकांच्या आणि प्रवेशांच्या माध्यमातून साकारली आहे. या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीसंबंधी एवढे धडधडीत पुरावे असलेला सिद्धान्त अभ्यासक्रमांतून वगळण्याचा अट्टहास का केला जातो आहे, हे समजत नाही. ‘एनसीईआरटी’तर्फे अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात हा सिद्धान्त समाविष्ट केला जाईल. यावर एक युक्तिवाद असा आहे, की दहावीनंतर सगळेच विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेत नाहीत. विज्ञानाव्यातिरिक्त अन्य शाखाही आहेत. अशा विद्यार्थ्यांना डार्विनचा उत्क्रांतिवाद कसा कळणार? असे विद्यार्थी भविष्यात कदाचित धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या मानव आणि अन्य सजीव यांच्या उत्पत्तीच्या व उत्क्रांतीच्या चुकीच्या, अशास्त्रीय, अंधश्रद्धा रुजवणाऱ्या, भ्रामक संकल्पना शिकतील. त्यांना डार्विन कधी भेटणारच नाहीत. संबंधित अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा आणि नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना डार्विन यांच्या मूलभूत उत्क्रांती सिद्धान्तांची ओळख करून द्यावी, एवढीच अपेक्षा.

Whtasapp source  

(लेखक विज्ञानाचे अभ्यासक आहेत.)