8.16.2022

माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान* लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)

*माण नदीचे मराठ्यांच्या इतिहासात योगदान*

औरंगजेबाची छावणी खवासपूर(सांगोला) येथे माण नदीच्या दोन्ही तीरावर सप्टेंबर १७०० रोजी पडली होती . मराठी मुलकात पावसाळा संपत येण्याची ही वेळ . त्यात सांगोला तालुक्यातून वाहणारी ही माण नदी फार मोठी नदी नाही. पावसाळ्यात चार दोन दिवस पूराचे पाणी आले तरी बस्स ! माण नदीच्या दोन्ही तीरांवर बादशाही सरदार, मनसबदार यांच्या छावण्या, तंबू, राहुट्या पडल्या होत्या. खुद्द माण नदीच्या पात्रात देखील काही सरदारांच्या राहुट्या पडल्या होत्या. यावेळी माण नदीचे पात्र कोरडे होते.

माण नदीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकड्यात ता.१ ऑक्टोबर १७०० चे रात्री मुसळधार पाऊस पडला . खवासपूर छावणीतील मोगली सैन्य गाढ झोपेत असताना या पावसाने आलेल्या पूराची लाट नदीच्या पात्रात घुसली. लाटेच्या तडाख्याने नदी तुडुंब भरून वाहू लागली. तसेच नदीच्या पलीकडे असलेल्या मैदानातही पाणी घुसले. माण नदीच्या अचानक आलेल्या पूराने छावणीतील अनेक माणसे आणि जनावरे पाण्याच्या ओघात वाहून गेली. उरलेल्या अनेकांची चीज वस्तू नाहीशी होऊन ते नंगे फकीर बनले. या मंडळीत अमीर - उमरावांचा देखील समावेश होता. बादशाही छावणीतील सर्व तंबू आणि इतर मालमत्ता यांची अमाप हानी झाली.

    मध्यरात्र होण्याच्या थोड्या आधी जेव्हा छावणीत पूराचा लोट कोसळला तेव्हा साऱ्या छावणीत मोठमोठ्याने एकच आरडाओरडा सुरू झाला. मराठे अचानक छावणीत घुसले असे औरंगजेबाला वाटले. त्यामुळे तोही दचकून जागा झाला. त्याचा पाय तंबूच्या कनाताचे दोराला अडखळून तो पडला. त्यामुळे त्याचा उजवा गुडघा निखळला. 

फौजेत शाही हकीम होते. त्यांनी तातडीने उपचार केले. पण बादशहाचा निखळलेला गुडघा त्यांना खोबणीत बरोबर बसविता आला नाही. त्यामुळे बादशहा मरेपर्यंत लंगडाच राहिला. पायाला झालेल्या दुखापतीमुळे औरंगजेब बादशहा सतत तीन दिवस दरबारात जाऊ शकला नाही.

तीन दिवसांच्या दुखण्यानंतर बादशहा दरबारात आला तेव्हा बादशहाचा आवडता शहाजादा कामबक्ष याने एक हजार अश्रफ्या, दोन हजार रुपये व एक स्फटिकाचा पेला ओवाळून टाकण्यासाठी म्हणून बादशहाला नजर केला. 

औरंगजेब बादशहाच्या प्रवासातील मजला ठरविणे व मुक्कामाची जागा निवडणे याला #खुशमंजील म्हणत. त्या अधिकाऱ्याने अशी ही धोक्याची जागा मुक्कामासाठी कशी निवडली याची विचारणा त्याने मुखालीसखानाला केली. तसेच या संबंधीत अधिकाऱ्याचे हुद्दे काय आहेत याची माहिती घेण्यास त्यास सांगितले.

खवासपूरच्या माण नदीच्या पात्रात अचानक आलेल्या पूरामुळे बादशहा अडकून पडल्याने त्याचा गुडघा निखळला . तो १९ नोव्हेंबर रोजी बरा झाला . बादशहाने या दिवशी आंघोळ केली. तसेच ज्या हकीमाने बादशहाच्या गुडघ्यावर उपचार केले त्यालाही बादशहाने खिलतीची वस्त्रे दिली.

माण नदी एक छोटीशी नदी !

कधीतरी पावसाळ्यात वाहणारी व इतर काळात ठणठणीत कोरडी राहणारी. या चिमुरड्या नदीने सुद्धा मराठ्यांच्या लढ्यात आपले योगदान दिले. काबुल कंदाहार पासून जिंजी वेलोरपर्यंत राज्य कारभार करणारा हा बादशहा तिने कायमचा लंगडा करून टाकला . त्यामुळे या नदीचेही हे ऐतिहासिक कार्य असेच म्हणावे लागेल .

संदर्भ – सोलापूर जिल्ह्याचा इतिहास - मराठा कालखंड

लेखक – गोपाळराव देशमुख(पंढरपूर)

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home